नाशिकमधील पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक ) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिरसभा झाली. या जाहिर सभेच्या आधीपासूनच नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र भाजपाकडून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात चकार शब्द काढला नाही.
त्यानंतर पिंपळगांव बसवंत येथील जाहिरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षावर नकली असल्याचा आरोप करत यथेच्छ टीका केली. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर एक चकार शब्द काढला नाही. त्यामुळे नाशिक मधील एका तरूण शेतकऱ्याने अखेर जाहिर सभेतच कांद्या प्रश्नी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न केला. तसेच कांद्यावर बोला, कांद्यावर बोला अशी जाहिर मागणी केली. त्यावर भाजपा समर्थकांनी मोदी मोदी अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर क्षणभर थांबलेल्या नरेंद्र मोदी यांनीही श्रीरामाच्या नावाच्या घोषणा दिल्या.
त्यावेळी सभेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी सदर तरूणाला तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कांद्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती जाहिर सभेत दिली. तर जाहिरसभा झाल्यानंतर संबधित तरूणाला पोलिसांनी सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे.