शाळांमधील देण्यात येत असलेल्या पोषक आहार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या बिस्किटे खाल्याने ८० विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. हि घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील आहे. सुमारे ८० विद्यार्थ्यांना पोषण आहार कार्यक्रमाचा भाग म्हणून दिलेली बिस्किटे खाल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली.
केकेत जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शनिवारी सकाळी ८:३० च्या सुमारास बिस्किटे खाल्ल्यानंतर मुलांना मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरु झाला. सुरुवातीला एका-दोघांना सुरु झालेल्या त्रास आणखी काही विद्यार्थ्यांनाही होऊ लागला. ही संख्या बघता बघता ८० च्या घरात गेली. त्यामुळे त्रास होऊ लागलेल्या मुलांना तातजीने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
बिस्कीटे खाल्यानंतर विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती मिळताच, गावप्रमुख आणि इतर अधिकारी तातडीने शाळेत पोहोचले आणि रुग्णालयात नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था केली. विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे म्हणाले, शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बिस्किटे खाल्ल्यानंतर २५७ विद्यार्थ्यांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आढळून आली. त्यापैकी १५३ विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्यात आले, तर काहींवर उपचार करून घरी पाठवून देण्यात आले.
मात्र, गंभीर लक्षणे आढळलेल्या सात विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, शाळेत २९६ विद्यार्थी आहेत. अन्नातून विषबाधा कशामुळे झाली याचा तपास सुरू असल्याचेही डॉ घुगे यांनी सांगितले.