संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांग्लादेश घडवण्याचे षड्यंत्र होते अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य कंगना राणावतने केले. कंगणा राणावतच्या या वक्तव्याचा निषेध अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी कॉ अजित नवले यांनी केला.
कॉ अजित नवले पुढे बोलताना म्हणाले की, संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ६०० पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना कॉ अजित नवले म्हणाले की, कंगना राणावत यांनी यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अजित नवले म्हणाले की, कंगना राणावत करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचेही यावेळी सांगितले.