मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ विरोधक महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारत भलामोठा मोर्चा काढला. या मोर्चात शिवद्रोही सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुकीला माफी नाही, गद्दारांना शिक्षा झालीच पाहिजे अशा राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात येत होत्या. या आंदोलनावरून भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर टीका करत आंदोलन राजकिय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीचं आज जे आंदोलन करण्यात आलेलं आहे, ते पूर्णपणे राजकिय हेतूनं प्रेरित आहे. महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस असो शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही असा आरोप करत, पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेली भाषण आठवा, त्यांच्या एकाही भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. इतकेच काय जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का उल्लेख नव्हता असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मध्य प्रदेशात कमलनाथ यांच सरकार असताना शिवाजी महाराजांचा पुतळा बुलढोझरने हटविला, याची माफी मागणार का, कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा तोडण्यात आला असा सवाल करत स्वातंत्र्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असा खोटा इतिहास काँग्रेसने शिकविला, खरं पाहता शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही तर त्या भागावर हल्ला केला होता. त्यामुळे सुरतेतील लोकांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला काँग्रेसने सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला असून त्यांनी आधी देशाची आणि शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणीही केली.