सध्या राज्यासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सवाची धाम धुम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेणार असून लालबागच्या राज्याचे दर्शनही घेणार आहेत. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक संस्था, उद्योग प्रकल्प गुजरातला पळवून नेणार नाही ना… आता लालबागचा राजा ही गुजरातला नेतील आणि म्हणतील गुजरातमधील लालबागचा राजा आणि याची परंपरा गुजरातमधूनच सुरु झाली. ते काहीही करू शकतात, लालबागच्या राजाचं नावं मोठं आहे. देशभरातून लोक येत असतात, चला गुतरातला नेवू शकतात असं होऊ शकतं अन् लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा प्रस्ताव ठेवू शकतात, व्यापारी लोक आहेत. मी तुम्हाला सांगतोय मी विचारपूर्वक बोलतोय, हे लोकं महाराष्ट्राला शत्रू मानतात, त्यामुळेच भाजपाच्या अनेक नेत्यांना मुंबई लुटायची असल्याचा आरोपही यावेळी केला.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अमित शाह यांना विरोध आहे ते यासाठीच की त्यांनी जे महाराष्ट्रात दळभद्री राजकारण सुरु केलंय महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून अनेक उद्योग, व्यापार, रोजगार आणि अनेक महत्वाचे आर्थिक केंद्र गुजरातला नेले. त्यामुळे अमित शाह यांच्या याबाबत तीव्र भावना असल्याचेही सांगत जरी ते गृहमंत्री असले तरी ते कमजोर गृहमंत्री असल्याची टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पुर्णतः ढासळलेली आहे. जम्मू आणि काश्मीर, मणिपूरमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांच लक्ष नाही. राजकारण, पक्ष फोडी लुटमार करणं याला पाठिंबा देणं, महाराष्ट्र लुटन, लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं अशी काम केली जात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीसारखे स्वाभिमान पक्ष फोडणे असली कामं करून महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विकलांग करण्याची स्वप्न घेऊनच अमित शाह हे मुंबईत येत असतात, त्यामुळेच त्यांना शत्रु मानतो असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना म्हणाले की, शरद पवार यांच्या डोक्यात काय चालू आहे कोणालाच समजत नाही. २०१९ ला त्यांच्या डोक्यात काय चालले होते याची पुसट्शी कल्पनाही नव्हती. त्यामुळेच शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. कदाचित फडणवीसांना शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरु आहे हे कळले असते तर देवेंद्र फडणवीस यांची आज जी काय पदावनती आणि परिस्थिती झालीय ती कदाचित झाली नसती असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.