Marathi e-Batmya

त्या वादावर शाहरूख खानची पहिली प्रतिक्रिया, माणसाला मर्यादा घालणाऱ्या…

मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. त्यातच या चित्रपटातील बोल्ड दृश्ये आणि दिपिका पदुकोणने परिधान केलेली भगवी बिकिनी यामुळे हिंदूंचा अपमान होत असल्याचा आरोप हिंदू महासभा आणि काही भाजपा नेत्यांनी केला. अशातच चित्रपटावर बॉयकॉट करण्याची मागणीही सोशल मीडियावरही जोर धरू लागली. त्यातच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी या भगव्या बिकणीवरून हिंदूत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. या सगळ्या पार्श्वभूमीवर शाहरूख खान काय बोलणार याकडे लक्ष लागलेले असतानाच कोलकाता येथील एका कार्यक्रमात शाहरूख खानने याबाबत मोठे वक्तव्य केले.

शाहरुख खानने आज कोलकाता चित्रपट महोत्सवासाठी हजेरी लावली. यावेळी त्याने सोशल मीडियाच्या वापराबद्दल भाष्य केले. यावेळी शाहरूख खान म्हणाला, माणसाला मर्यादा घालणाऱ्या अशा विशिष्ट प्रकारच्या संकुचित दृष्टिकोनावर सोशल मीडिया पोसला जातो. मी असं वाचलंय की, नकारात्मक वातावरणात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढतो. नकारात्मक विचार यामुळे अशा प्रकारे एकत्रित येतात की त्याचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो.

पुढे आपल्या भाषणात शाहरुख खानने सिनेमाला आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणत त्याचे महत्त्व सांगितले. दरम्यान, शाहरुख खानने त्याचं भाषण एका दमदार संवादाने संपवविताना म्हणाला, तुमचे सीटबेल्ट बांधून घ्या. हवामान खराब होणार आहे. आम्ही काही दिवसांपासून इथे आलेलो नाही. तुम्हाला भेटू शकलो नाही. पण आता जग सामान्य झालं आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत. जग वाट्टेल ते करू देत, पण मी आणि तुम्ही आपण सगळे सकारात्मक आहोत. सर्व जिवंत आहोत, असेही सांगितले.

Exit mobile version