Breaking News

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची जमीन या खास बिल्डरला देण्याचा भाजपा युती सरकारचा डाव आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेड जवळच्या मिठागरांच्या जागेची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबईकरांचे हक्क मारायचे, मुंबईचे महत्त्व कमी करायचे आणि मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायच्या हा मोदानी अँड कंपनीचा एकमेव अजेंडा आहे. मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी हे महाभ्रष्ट भाजपा सरकार वाट्टेल त्या थराला जात आहे. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असून पर्यावरणदृष्ट्या मुंबईला याचे भयंकर परिणाम सोसावे लागणार आहेत. मुंबईकरांचा विरोध असताना टेंडरमध्ये सोयीस्करपणे बदल करून अदानीला धारावीची जागा दिली आणि नंतर धारावी पुनर्विकासाच्या आडून मुंबईतील जवळपास १५०० एकर जागा अदानींच्या आणि विकासक मित्रांच्या घशात घातली. हे होत असताना आता अजून एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा मोदानी अँड कंपनीने केल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘अपात्र’ धारावीकरांसाठी घरे देण्याच्या नावाखाली मोदीनीला जमीन दिली जात आहे पण आम्हाला पात्र-अपात्र मान्य नाही. प्रत्येक धारावीकराने, आपल्या रक्त आणि घामाने धारावी उभी केली आहे, त्यामुळे पात्र-अपात्रचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व धारावीकरांना धारावी मध्येच घरे मिळाली पाहिजेत ही आमची भूमिका आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव घेऊन प्रचंड प्रमाणात भूखंड बळकावण्याचे हे मोठे कारस्थान आहे. हा विकास नाही तर मुंबईकरांची लूट आहे. मुंबईचे भविष्य हे विक्रीसाठी नाही हे लक्षात ठेवा असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठागरे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही मिठागरे दर पावसाळ्यात कोट्यवधी लीटर पाणी आपल्या पोटात साठवतात. मुंबईकरांना पुराचा फटका बसण्यापासून वाचवतात. तेव्हा मिठागरांच्या जमिनीवर भराव घालून तिथे इमारती उभारल्या, तर शहराला भयंकर पुराचा धोका संभवतो. पर्यावरणदृष्ट्या, खारफुटी जमिनींवर सरसकट बांधकाम परवानगी देण्याचे भयंकर परिणाम होणार आणि असे करणे पर्यावरण व संरक्षण कायद्याच्याही विरोधात असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार केला कमी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *