Marathi e-Batmya

भाजपा खा. डॉ अनिल बोंडे यांचा मोठा दावा, मुस्लिम तरुणाचा हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा दावा करत हिंदू मुलीची संमती नसताना तिच्या मनाविरुद्ध हा विवाह लावला असून ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, असा दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

संबंधित मुलीचा ज्याठिकाणी विवाह झाला ती संस्था व वकील बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुस्लीम समुदायला गंभीर इशारा दिला. आपली पोरं सांभाळा, ते जबरदस्तीने हिंदू मुलीशी लग्न करत आहेत. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धमकीवजा इशारा बोंडे यांनी दिला.

या घटनेची अधिक माहिती देताना बोंडे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील हिंदू मुलीची रुग्णवाहिका चालक मुस्लीम मुलानं दिशाभूल केली आहे. पीडित मुलीचं बीएससी शिक्षण झालं असून मुस्लीम मुलगा नववी उत्तीर्ण आहे. मुस्लीम मुलानं २९ ऑगस्ट रोजी हिंदू मुलीला भूलथापा देऊन पळवून नेलं. अमरावतीला गेल्यानंतर येथील एका बोगस संस्थेद्वारे लग्न लावल्याचं प्रमाणपत्र दिलं. त्या प्रमाणपत्रावर काझीचं नाव नाही, केवळ सही आहे. या संस्थेला लग्न लावण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु पैसे घेऊन लग्न लावल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला.

दुर्दैवाची बाब म्हणजे धारणी येथील पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. दोघांचं लग्न झाल्याचं सांगून त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला. कालपासून ती मुलगी मला माझ्या आई वडिलांकडे जायचं आहे, असं म्हणत आहे. अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना अतिशय मोठ्या प्रमाणात घडत आहेत. महाविद्यालयासमोर गाड्या घेऊन ही मुलं मुलींना त्रास देतात. मुलींना पटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी या मुलांना त्यांच्या समाजाचं पाठबळ मिळतं, असा आरोपही त्यांनी केला.

माझी मुस्लीम बांधवांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पोरांना सांभाळावं. अशा घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होतो. मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलीचा विवाह संपन्न झाल्यानंतर समाजातील लोकांनी फटाके फोडले, ही अतिशय निषेधाची बाब आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील मोठ्या लोकांनी आपल्या मुलांना सांभाळावं, हे लव्ह जिहाद आणि प्रेमात अडकवण्याचं नाटक ताबोडतोब बंद करावं, याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

विशेष म्हणजे, राज्यात लव जिहाद प्रकरणावरून नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादचे प्रकार राज्यात घडल्याची नोंद नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर पुन्हा राणे यांनी अशा घटना घडत असल्याचा मुद्दा आग्रहाने मांडला. त्यावर अखेर फडणवीस याबाबत अधिक चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.

https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1567150264154562561?s=20&t=HpaHEyt2IY9CfLRhN956Ag

Exit mobile version