Marathi e-Batmya

एसआरए प्रकल्पांबाबत डॉ.जितेंद्र आव्हाडांचा आणखी एक नवा निर्णय

ठाणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भविष्यात वैद्यकीय सुविधांची वानवा भासू नये, यासाठी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटाचे आरोय केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
म्हाडा, एसआरए योजनांच्या वास्तूंमध्ये सर्वसामान्यांची आरोग्य व्यवस्था राबविण्यासाठी, आरोग्याशी संबधित पायाभूत यंत्रणा उभारण्यासाठी, परिणाम कारण उपचारांसाठी कृती कार्यक्रम तयार करण्याचे आदेश या आधीच डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तसेच, गृहनिर्माण खात्याच्यावतीने स्वतंत्र क्वारंटाईन यंत्रणाही सुसज्ज केली. ठाणे शहरातील मुंब्रा आणि कळवा येथे कोविड रुग्णालयही विकसीत केले.
आता भविष्यात रुग्णालयांची कमतरता भासू नये, हा दूरदृष्टी विचाराने प्रेरीत होऊन फ्री ऑफ एफएसआय या तत्वावर झोपडीधारकांसाठी प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटांचे रुग्णालय उभारण्याचे आदेश दिले. ही आरोग्य केंद्रे उभी राहिल्याने झोपडपट्टीतील नागरिकांना ते रहात असलेल्या ठिकाणीच चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पामध्ये एक बालवाडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय आणि मनोरंजन केंद्रही फ्री ऑफ एफएसआय या तत्वावर सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले.
एसआरएच्या प्रकल्पात विकासकांकडून मुळ झोपडीधारकांना मिळणाऱ्या जागेत कपात करून तो सेलबल अर्थात विक्रीयोग्य अशा सदनिकांना दिला जातो. तसेच या झोपडीधारकांचे कमी जागेत पुर्नवसन करण्याच्या घटना अनेक आहेत. त्यातच आता १ ते ५ हजार चौरस फुटाचे आरोग्य केंद्र सुरु करण्याची घोषणा चांगली असली तरी ती झोपडपट्टीवासियांचे करण्यात येणाऱ्या पुर्नवसनाच्या जागेत उभारणार की विकासकाला मिळणाऱ्या सेलेबलच्या जागेत उभारणार यात स्पष्टता आणली तर झोपडीधारकांना आणखी दाटीवाटीने रहायची पाळी येणार नाही.

Exit mobile version