Marathi e-Batmya

अजित पवार म्हणाले, “आम्ही पण मराठा समाजातून आहे…म्हणत त्या तरूणाला फटकारले”

मराठी ई-बातम्या टीम

शिवजन्मोत्सवा निमित्त शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना मध्येच एका तरूणाने उठत,” ओबीसी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या वतीने एक विनंती आहे, २३ मार्च १९९४ चा GR काढला होता. ओबीसी आरक्षण वाढवण्याबद्दल राज्यात श्वेतपत्रिका निघायला पाहिजे. १४ टक्के आरक्षण ३० टक्के केले ते मराठांच्या हक्काचं होतं. परत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे” अशी मागणी केली. त्यावर अजित पवार म्हणाले मध्ये बोलू नका, मी मघाशी तुम्हाला बोलू दिलं ना? मग आता बोलू नका, त्यावर तो तरूण पुन्हा बोलू लागल्यावर अजित पवार म्हणाले हे तुमचं योग्य नाही. तुम्ही कोणाची सुपारी घेवून आलात का? असा संतापून सवाल केल्यावर तो तरूण शांत झाला.

त्यानंतर काहीही झाले नसल्यासारखे करून अजित पवारांनी आपले भाषण पुन्हा सुरु करत म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मी आम्ही सगळेच मराठा समाजातून आहोत. आम्हालाही काही वाटतं की नाही असा सवाल उपस्थित समुदायाला करत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण इतर समाजाला मिळालेल्या आरक्षणाला धक्का न लागता हे मिळाले पाहिजे. जसे शिवबांनी अठरापगड समाजाला सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. त्यानुसार आपल्यालाही सगळ्यांना सोबत घेवून जायचे आहे.

काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही विधीमंडळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कारणाने न्यायालयाकडून ते आरक्षण फेटाळण्यात आलं. नंतर आयोग स्थापन करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. ५० टक्क्यांवर आरक्षण जाऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच यासंदर्भात कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे असेही ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवार हे बोलत असताना तो व्यक्ती पुन्हा उभा राहिला. तेव्हा अजित पवार वैतागून म्हणाले, “तू कोणाची सुपारी घेऊन आला आहेस का?, मी एकदा तुमचं ऐकून घेतलं. आता तुम्ही माझं ऐका. आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची. आम्हाला कळत नाही का, आम्ही पण मराठा समाजाचे आहोत, पण राज्याचे नेतृत्व करत असतांना सगळा विचार करावा लागतो. असं असतांना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, विधिमंडळ एकमताने ते मंजूर केलं. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, कारण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, असल्याचे म्हणत त्यांनी त्या तरूणाला फटकारले.

तरुण मुलांचं रक्त सळसळत असतं, हे आम्हाला मान्य आहे, परंतु आरक्षणात येणाऱ्या कायदेशीर अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना आजच्या दिवसाच्या निमित्ताने विनंती करतो की त्यांनी आंदोलन करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

Exit mobile version