मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला लगावला.
कबूतरांच्या मुद्द्यावरून भाजपा युती सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे. भाजपा युती सरकारचे काम म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असे आहे. राज्यात शेतकरी संकटात आहे, तरुण मुलामुलींना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारच असे वाद उकरून काढत आहे असा आरोपही यावेळी केला.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, दादरच्या कबुतरखाना येथे झालेल्या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे सांगितले जात आहे पण हा सुद्धा बनाव आहे. राज्यात कोठेही काहीही घटना घडली की बाहेरच्या लोकांनी ती घडवून आणली हे ठोकळेबाज उत्तर देऊन सरकार आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीकाही यावेळी केली.
डबल इंजिन सरकार की डबल गँगवॉर?
बेस्ट प्रशासनाचा अतिरिक्त कारभार एकनाथ शिंदे यांनी अश्विनी जोशी यांच्याकडे दिला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शर्मा यांची नियुक्ती केली यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अधिका-यांच्या बदल्यांवरून गॅंगवार सुरु आहे. एका पदासाठी, एकाच दिवशी फडणवीस व शिंदे यांनी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मलाईदार पदावर ‘आपलाच माणूस’ बसविण्यासाठी सुरु असलेला हा संघर्ष पाहता सरकार आहे की टोळीयुद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे, अशी टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya