महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असता पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १२८ डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी वाढवण बंदर, पेसा भरती आणि शेतमालाला हमी भाव या प्रश्नी विधानभवनात फलक झळकवत जिल्ह्यातील विविध मागण्यांप्रश्नी आंदोलन केले.
यावेळी आमदार निकोले यांनी आमची एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द, आदिवासी पेसा भरती झालीच पाहिजे, नोकरी आमच्या हक्काची नाही कोण्याच्या बापाची ! शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांच्या मालाला हमीभाव द्या ! अश्या जोरदार घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली.
आ. कॉ विनोद निकोले म्हणाले की, गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतात अवधानी खारफुटीचे तिवर झाडे आली तर ती बुजवण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्यांनी केला तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. इथे तर चक्क समुद्रामध्ये ५००० एकर क्षेत्रात मातीचा भराव करून हे विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने आखला आहे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय धोक्याचे आहे. तर, आदिवासी भागातील उच्चशिक्षित मुला-मुलींना रोजगार मिळावा हा त्यांचा हक्क आहे. कारण या क्षेत्रामध्ये पेसा कायदा लागू आहे. तसेच, जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेला शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होतोय. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हा मिळालाच पाहिजे, अशी मागणी आमच्या अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सातत्याने विविध ठिकाणी आंदोलन करून करण्यात येत असते त्याच अनुषंगाने आज ही मागणी आम्ही विधानभवनात करत असल्याचे सांगितले.