Marathi e-Batmya

शरद पवार यांचा निर्धार, सरकार बदल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपा सोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले, ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले. ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नेते राजेश (राजाभाऊ) फड यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सरचिटणीस अदिती नलावडे, सरचिटणीस रवींद्र पवार, यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे, येथील चित्र बदलतय, लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ते दिसलं. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही ४०० पार निवडून येणार, पण त्यांचे किती खासदार आले. राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या, त्यापैकी ८ जागा आपण जिंकून आणल्या, असेही सांगितले.

बीड हा शरद पवार साहेबांचा जिल्हा – खासदार बजरंग सोनवणे

परळी काय करते? लोकसभेत दाखवून दिलंय, शरद पवार साहेबांचा नाद केल्यावर काय होतं?. शरद पवार साहेब यांना मानणारा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात पवार साहेबांची ताकद आहे, यावर संशोधन करण्याची गरज नाही, असे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. तसचे, राजे भाऊ तुमचं कौतुक, तुम्ही खरे बोलणारे आहात. परळीतून ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते सावध रहा, बळजबरी कोणाला येथे प्रवेशाला आणलं नाही. राजाभाऊ यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आता, २ महिने तुम्ही सहन करा, खासदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे, आता आपलं सरकार येणार आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

कुणाचाही नाद करा पण शरद पवार साहेबांचा नाद करु नका !- राजेश फड

शरद पवार यांचे मी आभार मानतो त्यांनी मला पक्षात प्रवेश दिला. पीक विमा हा आमच्या परळी तालुक्यात २५ टक्के शेतकऱ्यांना मिळतो आणि बाकीचे ७५ टक्के पिक विम्याची रक्कम वाटली जाते, पण आपली सत्ता आली तर तुम्ही याची चौकशी लावा अशी मागणी राजेभाऊ फड यांनी शरद पवार यांच्याकडे केली. पक्ष प्रवेशाला आम्ही जेव्हा परळीमधून मुंबईसाठी निघत होतो तेव्हा आम्हाला आणि आमच्या गाडीला अडवलं आहे आणि ते घाबरलेले आहेत असेही फड यांनी सांगितले.

पुढे बोलताना राजेश फड म्हणाले की, बराच निधी आमच्या परळीला मिळाला आहे, पण तो निधी कुठे गेला, या संदर्भातील माहिती माझ्याकडे आहे. त्यासंदर्भात मी लवकरच हायकोर्टात जाणार आहे. आताचे आमदार यांनी पवार साहेबांशी गद्दारी केली आणि या आमदाराची परळीमध्ये अलीबाबा आणि ४० चोरांची टीम आहे, त्यामुळे फक्त याच लोकांचा विकास झाला आहे. मी शरद पवार यांच्या पक्षात जाणार आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण काढून घेतलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला. पालकमंत्री तुम्ही बोलला होता ना? कुणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका म्हणून मग आत्ता तुम्ही निवडणुकीत बघाच आत्ता आगामी निवडणुकीत काय होत ते असा इशाराही यावेळी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेश (राजाभाऊ) फड, अजित पवार गटाचे सोपानराव तोंडे, विक्रम देशमुख, पद्माकर लहाने, कौडगाव घोडाचे माजी सरपंच सतीश कुंडगीर, जळघव्हाणचे माजी उपसरपंच दत्तात्रय कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मंगलताई सोळंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद किरवले, नागापूरच्या माजी सरपंच अश्विनी सोळंके, शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा संघटक डॉ. जान मोहम्मद शेख व जयगांवच्या माजी सरपंच कुसुमताई शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

Exit mobile version