रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ७ कोटी रुपयांचा असा एकूण ७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, किशोर जोरगेवार यांनीही यावेळी उपप्रश्न उपस्थित केले.
पुढे बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी सद्या ऑरगॅनिक बायोटेक या कंपनीकडून दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असून अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोनवर आधारित प्रक्रिया करुन चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.
शेवटी बोलताना उदय सामंत म्हणाले की, महाड शहरातील चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेच्या स्व-निधीतून व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहिती सभागृहात दिली.