विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, विशाळगड येथील दुर्दैवी घटना सरकार पुरस्कृत जिल्हाधिकाऱ्यांची बदली तर जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका करत या दुर्देवी घटनेचा निषेध केला.

तसेच पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे, नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी, हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितीगड या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दुर्देवी घटना घडविल्या जात आहेत. विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील कायदे सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत हे दुर्दैव आहे. विशाळगड येथे तोडफोड होत असताना पोलीसांचे हात कोणी बांधले होते याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. रवी पडवळ खुले आम व्हीडीओवरून धमकी देतो पण त्याला सरकार का पकडत नाही असा सवाल देखील श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडविला असता तर दुर्देवी घटना घडली नसती. परंतु सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता, अशा शब्दात सरकारचे वाभाडे काढले. तसेच यासंदर्भातील चौकशीच्या मागणीचे पत्र विजय वडेट्टीवार यांनी सरकारला पाठविले.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *