Marathi e-Batmya

आपली भूमी..स्वच्छ चैत्यभूमी..स्वच्छ भूमी

मुंबई:  संजय बोपेगांवकर

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी ३ तारखेपासून आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. तीन दिवसांच्या अलोट गर्दीमुळे हा परिसर अस्वच्छ होतो. त्याचा आपल्याच बांधवांच्या आरोग्याला त्रास होतो, हे ओळखून तरूण आंबेडकरी अनुयायांनी पुढाकार घेत “आम्ही आंबेडकरवादी, आपली चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हा आगळा वेगळा उपक्रम राबवित स्वच्छता अभियान राबविले.
फेसबुक व्हाट्सअप ट्विटर अशा सोशल नेटवर्कींग माध्यमाव्दारे युवकांना आवाहन करून सुमारे ७०० युवक- युवती या अभियानात एकत्र आले आणि गेल्या दोन दिवसांपासून हे युवक युवती सकाळ दुपार संध्याकाळ शिवाजी पार्क चैत्यभूमि स्वच्छ करीत आहेत. कोणत्याही नेत्याला न विचारता कोणाचीही शिकवण नसताना केवळ समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ज्या महामानवामुळे आपण आज जगतो आहोत त्याची ही पुण्याई आहे.अशी समाज हिताची भावना बाळगून हे युवा कचरा साफ करताना दिसत होते.
आम्ही आंबेडकरवादी आपली भूमि चैत्यभूमि स्वच्छ भूमि या अभियाना करीता फेसबुकवर ग्रुप तयार केला. त्यास ७०० युवकांनी  प्रतिसाद दिल्याचे रोशन सुरवाडे, निलेश तायडे, अभय बोदडे, सुमिय तायडे, विकास बोदडे या युवकांनी सांगितले.

या करीता मुंबई मनपाच्यावतीने कचरा गोळा करण्याकरीता लागणारे साहित्य प्लास्टिकच्या पिशव्या, झाडू,  हातमोजे, मास्क पुरविल्याचे युवकांनी सांगितले.

आम्ही डोंबिवली येथून आलो असून मुंबई व उपनगरातील अनेक भागातून सुमारे ७०० मुलं आणि मुलांनी भाग घेतला आहे सकाळ संध्याकाळ पर्यंत ही आपल्या कर्तव्यासाठी मुलं राबत असल्याचे रोशन सुरवाडे यांने अभिमानाने सांगितले.
सहार भिमज्योत मंडळ (रजि) अंधेरी पुर्व सहारगाव येथील या मंडळाने गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी पार्क चैत्यभूमि परिसरात स्वच्छता अभियान राबविले आहे.

या मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल कळंबे या युवकाने सांगितले की, आमच्या टिममध्ये ८० मुलं मुली आहेत. आमच्यावर बाबासाहेबांनी केलेले उपकार आहेत. ते आम्हीच काय कोणीही फेडू शकणार नाही. पण जेवढे शक्य आहे ते मुठभर कार्य आम्ही करत आहोत. आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही विविध उपक्रम राबवित असल्याचे सागर कसबे, हेमंत भाकरे यांनी सांगितले.

याकरिता मुंबई मनपा आम्हाला साफ सफाई करीता लागणारे साहित्य पुरविते. यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला आम्ही घेत नसल्याचेही या युवकांनी सांगितले.
मंडणगड दापोली प्रतिष्ठानच्या वतीनेही असेच अभियान गेली दोन वर्षे राबविण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे सल्लागार किर्तिराज लोखंडे यांनी सांगितले. तर संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान याव्दारे या परिसरात स्वच्छता मोहीम तीन दिवस राबविण्यात येत असल्याचे सांगत सर्व मंडळे दिवस स्वच्छतेसाठी प्रयत्न करत असल्याचेही या युवकांनी सांगितले.

Exit mobile version