Marathi e-Batmya

दलित तरूणांच्या विरोधातील कोंबीग ऑपरेशन बंद करावे

मुंबईः प्रतिनिधी

महाराष्ट्र बंद नंतर आज दिवसभरात ठिकठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या दलित तरुणांची कोबींग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबवावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भेट घेतली. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भीमाकोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणीही मुख्यमंत्र्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

आज आमच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असल्याचे सांगत दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्र्यांनी कारवाई करुन लोकांना विश्वास द्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ बंद केलं जाईल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच आरोपींवर कारवाई होईल आणि त्यांना अटकही केली जाईल. पण संभाजी भिडेंना अटक होते की नाही ही गोष्ट आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट असून या दोघांना अटक झाल्याशिवाय शांतता शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

कालच्या बंदमुळे दलित समाजाचा राग एका जागी आम्ही कैद केला आहे. पण जास्त दिवसांसाठी हा राग कैद करता येणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगत भिडे आणि एकबोटे यांना अटक न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Exit mobile version