Marathi e-Batmya

राज्यघटनेच्या विटंबनेनंतर परभणी बंदला हिंसक वळण

मंगळवारी अर्थात काल काही समाजकंटकांनी परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण दलित समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंद पुकारण्यात आला. मात्र त्यास हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून दुकानांवर आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली.

या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधराच्या नळकांड्यांचा मारा पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेने केला. त्यामुळे संपूर्ण परभणीत मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे.

परभणीतील विसावा कॉर्नर परिसरातील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पाईप पेटवून देण्यात आले आहेत. या आगीत पाईप मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले आहेत. पोलिसांच्या गाडीवरही मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली आहे. तर आंदोलकांनी काही गाड्यांची मोडतोड केली आहे. मात्र पोलिसांच्या कडक भूमिकेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता पाह्यला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाला मराठवाड्यातून चांगल्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तसेच भाजपाचा घटता जनाधानही वाढलेला दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यात औरंगाबाद विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून चळवळ सुरु झाली होती. त्यावेळी दलित समाजाच्या विरोधात मराठवाड्यातील दलितेतर समाजाकड़ून मोठ्याप्रमाणावर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची समाजकंटकाकडून विटंबना करण्याची घटना घडली.

Exit mobile version