महाराष्ट्रासह देशभरात सध्या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत चालले असून ज्यांना अद्याप नीटस् मिसरूडही फुटले नाही की जीवनाचा अनुभव नाही की अध्यात्मिकता कशाशी खातात याचेही भान नाही अशा व्यक्ती स्वतःला संत, गुरू आणि महाराज ही उपाधी लावून स्वतःला दिव्यशक्ती असल्याचा दावा करत लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. अशा भोंदू लोकांच्या दाव्यातील पोल खोल अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुरन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी असाच दिव्य शक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र महाराज यास दिव्यशक्ती सिध्द करण्याचे खुले आव्हान देत ३० लाख रूपयांचे बक्षिस देऊ आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवू असेही जाहिर केले.
यानंतर धीरेंद्र महाराजांनी नागपूरमध्ये हे आव्हान न स्वीकारता ते उत्तराखंड येथील त्यांच्या दरबारात आव्हान स्वीकारले. धीरेंद्र महाराजांनी आव्हान स्विकारल्यानंतर श्याम मानव म्हणाले, तसेच महाराजांकडे माहिती मिळवण्याच्या यंत्रणा असल्याने त्यांनी हे आव्हान त्यांच्या दरबारात नाही, तर पत्रकार परिषदेत पंचसमितीच्या समोर स्वीकारावं, असे सांगितले.
श्याम मानव म्हणाले, ९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात.
याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात. या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रितसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलं आहे. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरुपात हे आव्हान दिलं आहे. या आव्हानाच्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण हे दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. तशाप्रकारे आम्ही अनेक बाबांच्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.
कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दाव्या करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहचू नये याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी आम्ही स्पष्टपणे म्हटलं की, ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
त्याचबरोबर आम्ही काही वस्तू एका खोलीत ठेवू, काही व्यक्तींनाही बसवू. त्या वस्तूंची माहिती आणि व्यक्तींची नावे त्यांनी सांगावित. त्यांच्या दिव्यशक्तीची सत्यता तपासण्यासाठी या सगळ्या गोष्टी व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात येतील आणि या गोष्टीची सिध्दता दोन वेळा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
