गुजरात मधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळण्याच्या घटनेला नुकतेच आठ दिवस झाले. या विमान अपघात दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह इतके जळाले होते, त्यांचे मृतदेहही ओळखण्यापलिकडे गेले होते. आता पर्यंत मृतदेहांची डीएनए मार्फत जवळपास २२० प्रवाशांची ओळख पटविण्यात आली आहे. तर २०२ जणांचे अवशेष प्रवाशांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे हस्तांतरींत करण्यात आल्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल म्हणाले, आतापर्यंत २२० डीएनए नमुने जुळले आहेत आणि या बळींच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. २०२ जणांचे अवशेष त्यांच्या कुटुंबियांना परत करण्यात आले आहेत, तर इतरांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
पुढे बोलताना ऋषिकेश पटेल म्हणाले की, २०२ बळींमध्ये १६० भारतीय होते – १५१ प्रवासी आणि जमिनीवर मृत्युमुखी पडलेले नऊ जण – सात पोर्तुगीज नागरिक, ३४ ब्रिटिश नागरिक आणि एक कॅनेडियन. १५ बळींचे अवशेष विमानाने नेण्यात आले, तर १८७ जणांना रस्त्याने पाठवण्यात आले असल्याचेही सांगितले.
तथापि, भाजपाच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारने अद्याप आपत्तीतील अंतिम मृतांच्या संख्येची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, २५० बळींचे डीएनए नमुने – ज्यामध्ये प्रवासी आणि जमिनीवर मृत्युमुखी पडलेले लोक यांचा समावेश होता – ओळख पटविण्यासाठी डीएनए गोळा करण्यात आले आहेत.
लंडनला जाणारे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर लगेचच एका निवासी भागात कोसळले, त्यात २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आणि जमिनीवर अनेक जण ठार झाले, ज्यात सरकारी बी.जे. मेडिकल कॉलेजचे चार विद्यार्थी होते. या दुर्घटनेतून फक्त एकच प्रवासी वाचला.
अहमदाबादेत अनेक मृतदेह गंभीरपणे जळालेले किंवा खराब झालेले असल्याने, अधिकारी बळींची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीवर अवलंबून आहेत.
