मुंबईः विशेष प्रतिनिधी
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात महाविकास आघाडीला चांगल्यापैकी यश आल्यानंतर आजपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात आली खरी मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक मुंबादेवीचे दर्शन घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रभादेवी येथील सिध्दीविनायकाचे दर्शन घेवून पुणे येथील दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेवून नंतर सांगली जिल्ह्यातील देवीचे दर्शन घेण्यासाठी पुढे गेले.
मागील वर्ष दिडवर्षापूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने हिंदूत्व सोडलं असल्याची टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही आमचं हिंदूत्व हे जानव्याचं हिंदूत्व नसल्याचे ठणकावून सांगत हिंदूत्वाचे धडे तुमच्यासारख्याकडून घेण्याची गरज नसल्याचे उत्तर दिले होते.
त्यापार्श्वभूमीवर आज मुंबईतील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे, मंदिरे आज उघडल्यानंतर चार महिन्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे मुंबईची कुलदैवता असलेली मुंबादेवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सप्तनिक दर्शन घेतले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सिध्दीविनायक मंदीरात जाण्याचे टाळले. मुंबईकरांसाठी सिध्दीविनायकापेक्षा मुंबादेवीचे महत्व जास्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मुंबादेवीचे दर्शन घेतले.
तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील सिध्दीविनायक मंदीरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर ते पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी सांगलीला रवाना झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पुण्याहून निघताना दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री संजय बन्सोड यांनीही दादर येथील चैत्यभूमी येथे जावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिम येथील दर्ग्यात जावून चादर चढविली. नाशिक येथे छगन भुजबळ यांनी येथील सप्तश्रुंगी गडावर जावून देवीची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.
ऐरवी मंदिर आणि मस्जिद किंवा चैत्यभूमीवर जावून दर्शन घेतल्याची माहिती कोणत्याही मंत्र्यांकडून प्रसारमाध्यमास दिली जात नाही. मात्र आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य मंत्रिमंडातील मंत्री आपापल्या मतदारसंघातील प्रसिध्द देवतांची पूजा करून दर्शन घेतले.
या पार्श्वभूमीवर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी आतापासून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात आल्याचे दिसून येत आहे.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादी आळवणार हिंदूत्वाचा राग
