मुंबईः प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून शहरातील धारावी झोपडपट्टीच्या पुर्नवर्सनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र या प्रकल्पाला गती देण्याच्या नादात एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न विचारताच परस्पर शेखलिंक कंपनीवर मेहेरनेजर दाखविण्यास सुरुवात केल्याने हा प्रकल्प शेखलिंकऐवजी अदानी समुहाला देण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
धारावी पुर्नवर्सन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबईतील शेखलिंक या कंपनीबरोबर सांम्यज्यस करार केला. तसेच या कंपनीला लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला. त्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच गृहनिर्माण विभाग, एसआरए, म्हाडा आदी संस्थांना पैसे उपलब्ध करून देण्याबाबत आणि रेल्वे मंत्रालयाला जमिन उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे काम गतीशील व्हावे म्हणून या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न विचारताच अनेक गोष्टींचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. तसेच निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या आय़एएस अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न विचारताच शेखलिंक या कंपनीला धारावी पुर्नवर्सन प्रकल्पाचे देकार पत्र देवून टाकले. विशेष म्हणजे या कंपनीला देकार पत्र देताना कोणत्याही अटी, शर्ती घातल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखलिंकला दिलेला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेत सदर प्रकल्पासाठी कमी किंमतीत प्रकल्प पुर्ण करणारा दुसरा विकासक असलेल्या अदानीला देण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांचा गट नेमला असून सदर आयएएस अधिकाऱ्याने दिलेल्या देकार पत्रामुळे राज्य सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत धारावी पुर्नवर्सन प्रकल्पाचे मुख्याधिकारी ई.व्ही.श्रीनिवासन यांच्याशी भेटून याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी भेट होवू शकली नाही.
धारावी पुर्नवर्सन प्रकल्प अदानीला?
