Marathi e-Batmya

‘जय भवानी’ चा नारा डॉ.आंबेडकरांनीच दिला, पण नवी माहिती असेल तर द्या

तसेच त्यांनी तो नारा अधिकृतरित्या वापरण्यास सुरुवातही केली. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेटरहेडवर अधिकृत छापण्यातही आले होते असा दावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी एका ट्विटच्या आधारे केला.

ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय. जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. याला दुजोरा देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असल्याचेही आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असेही त्यांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्या वेळी शिवाजी महाराज, महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने “शिवाजी महाराज”, “राजमाता जिजाऊ” यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती असे ट्विट करत ठेकेदारांनो जरा वाचायला शिका असा खोचक टोलाही लगावला.

अनेकांना जय भवानी घोषणेबाबत पूर्ण माहिती नाही. १९२७-३० च्या काळात जो महाडचा सत्याग्रह झाला त्याचा आधार काय, त्यात कोणत्या घोषणा देण्यात आल्या याची फक्त माहिती मी सार्वजनिक केली. महाडला सत्याग्रहाची तयारी सुरू झाली. तेव्हा १९२४ ला पहिली बैठक झाली. त्यानंतर बदलापूरला जय भवानीची घोषणा झाली. सर्वात आधी बाबासाहेब आंबेडकर यांनीच ही घोषणा दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत बोलताना सांगितले.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधी कोणी जय भवानी ही घोषणा दिली असेल तर त्याची माहिती समोर येऊ द्या. शिवाजी महाराजांचा दडलेला इतिहास बाहेर येऊ द्या. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. स्वातंत्र्याच्या कालावधीत शिवाजी महाराजांना पुन्हा सार्वजनिक जीवनात आणण्याचा एक लढा झाला. त्याविषयीची जेवढी अधिक माहिती येईल तेवढी चांगली. मी असं म्हणेन की आम्ही याची सुरुवात केलीय असे सांगत जय भवानी घोषणा १९२४ च्या आधी वापरल्याची माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांनी ती समोर आणावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Exit mobile version