Marathi e-Batmya

गरीबीमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या मंत्र्याने अखेर पदवी मिळवलीच

मुंबई : प्रतिनिधी

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून स्वत:बरोबर घरच्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी धरली. मात्र कालापरत्वे या विपरीत परिस्थितीवर मात करत सधनता मिळविल्यानंतरही आणि व्यस्त राजकिय जीवनातही आपले शिक्षण पूर्ण करून पदवी मिळणारे थोडेच असतात. या थोड्यांमध्ये आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला असून त्यांनी नुकतीच पदवीची परिक्षा ७७ टक्क्याने उत्तीर्ण होत समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

गरिबीमुळे वयाच्या १६ व्या वर्षी शिक्षण सोडून एकनाथ शिंदे यांनी मत्स व्यवसायात नोकरी धरली. मात्र या कालावधीतही त्यांनी आपली शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द सोडली नाही. नोकरी करत असताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात येवून ते शिवसैनिक झाले. दिघे यांच्यानंतर शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेची धुरा सांभाळली. आमदार झाल्यानंतर दोन वेळा मंत्री आणि शिवसेनेतील नंबर दोनचे नेते म्हणून त्यांची सध्या ओळख राज्यात आहे.

तरीही त्यांनी आपली अपूरी राहीलेली शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून त्यांनी कला शाखेतून पदवीची परिक्षा ७७.२५ टक्के मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. आज त्यांचे वय ५६ असून त्यांच्या या कृतीने समाजातील तरूणांसमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.

Exit mobile version