कोरोना मृत्यु लपवल्याबद्दल केंद्रातले मोदी सरकार आणि गुजरात राज्य सरकार मोठे बदनाम झालेले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा कोरोना मृत्यु लपवल्याची माहिती सरकारच्याच आकडेवारीतून उघड झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोरोना बळी लपवलेले नाहीत हा दावा पूर्ण खोटा पडला आहे.
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात ७८ लाख ८१ हजार २३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १ लाख ४७ हजार ८५५ इतके रुग्ण कोरोना बळी गेले, अशी माहिती आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. मात्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून कोरोना मृतांच्या वारसांना ५० हजार रुपये अनुदान म्हणून दिले जात आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत १ लाख ८३ हजार ३७५ इतक्या मृतांच्या वारसांना अनुदान देण्यात आले आहे.
राज्य सरकारने यासाठी ऑनलाईन पोर्टल बनवले आहे. त्यावर ऑनलाईन अर्ज दाखल करायचा असतो. तो अर्ज व मृतांची कागदपत्रे सादर केली की ३० दिवसांमध्ये वारसांच्या खात्यात ५० हजार रुपये अनुदान म्हणून जमा होतात. राज्य सरकारकडे आजपर्यंत २ लाख ५४ हजार ५७१ अनुदानासाठी अर्ज आले. त्यापैकी १ लाख ८३ हजार ३७५ मृतांच्या वारसांचा दावा योग्य म्हणून मंजूर करण्यात आला.
३६ हजार ६८ अर्ज नाकारण्यात आले असून ५० हजार ५९५ अर्जदारांनी जिल्हा समितीकडे अपील केले आहे. त्यामध्ये २७ हजार १९९ अर्ज अनुदानासाठी मान्य करण्यात आले असून ५ हजार ५५८ अर्ज नाकारण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सरकारी यंत्रणेने एकही कोरोना मृत्यु लपवला नसल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र सरकारची आकडेवारी पाहता मृतांपेक्षा मदत अधिक कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असा प्रकार गुजरात मध्ये झाला आहे. तसेच केंद्र सरकारचे कोरोना मृत्यु आकडे खोटे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
सरकार म्हणते राज्यात कोरोनामुळे १.४७ लाख मृत्यू मात्र दावे १. ८३ लाख मंजूर, नेमका आकडा किती?
