Marathi e-Batmya

१५ विमानातून २ हजार ९०० विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी आणले

मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या विरोधात सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थी आणि नागरीकांना भारतात आणण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, मागील २४ तासांमध्ये १५ विमाने भारतात पोहचली असून, ज्यामध्ये जवळपास २९०० भारतीयांना आणले गेले. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० भारतीयांना घेऊन ६३ विमाने भारतात पोहचली. तर, पुढील २४ तासांसाठी आणखी १३ विमाने नियोजित करण्यात आलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत की युक्रेनमध्ये आणखी किती भारतीय आहेत. जे तेथे आहेत, परंतु नोंदणीकृत नाहीत त्यांच्याशी दूतावास संपर्क करेल. आम्ही २९८ विद्यार्थ्यांना जवळच्या पिसोचिन येथे स्थलांतरित केले असून हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.

 

तसेच, आम्ही येत्या काही तासांत पिसोचिन आणि खारकीव्ह मधून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला. आतापर्यंत आम्हाला माहित आहे की खारकीव्ह मध्ये कोणीही शिल्लक नाही. आता आमचे संपूर्ण आणि मुख्य लक्ष्य सुमीवर आहे. आमच्यासमोर आव्हान कायम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान सुमी आणि इतर काही भागात भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असून तेथे रशियाने मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरु केल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेल, बंकरमधून युक्रेनच्या सीमावर्ती भागात पोहोचता येत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना अंधारात आणि अन्न- पाण्याशिवाय राहण्याची पाळी आली आहे. अशी माहिती देणारे अनेक व्हिडिओ सध्या विविध समाजममाध्यमातून व्हायरल झाल्याचे दिसत आहे.

 

Exit mobile version