Marathi e-Batmya

सर्वबाद १९१ पाकिस्तानवर भारताचा ७ गडी राखून विजय

कसोटी सामना असो की २०- ट्विंटी क्रिकेटचा सामना असो भारत विरूध्द पाकिस्तान सामन्यात कोण जिंकतो आणि कोण हारतो या गोष्टीकडे भारतासह सबंध जगभराचे डोळे या सामन्याकडे लागलेले असतात. तसेच दोन्ही सामन्यात रोमहर्षक खेळ होत असल्याने सबंध जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाच्या दृष्टीने सामना असतो. आज एकदिवसीय विश्वचषक २०२३ सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याने या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत यजमान संघ पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असून भारताने ७ गडी राखून विजय मिळविला आहे.

भारताच्या या विजयाने विश्वषक सामन्यातील तीन विजय भारताच्या खात्यावर नोंदविले गेले आहेत. तर वनडे मालिकेत पाकिस्तानविरूध्दची अपराजित मालिका ८-० अशी कायम राहिली आहे. या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीची जादू या सामन्यात काही चालली नाही. मात्र रोहित शर्मा, श्रेयस अय्यर या दोघांनी मात्र भारतीय संघाला विजयीश्री मिळवून देत भारताचे विश्वचषक स्पर्धेतील भारताचे स्थान मजबूत करण्याला मदत केली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.

पाकिस्तानकडून मिळालेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेंग्यूमधून बरा झालेला शुबमन गिल ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकरवी झेलबाद केले. शुभमन फॉर्ममध्ये दिसत आहे आणि आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ही चांगली बातमी आहे. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रिजवर आला. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली. कोहलीने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. हसन अलीच्या चेंडूवर मोहम्मद नवाज झेलबाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर क्रीझवर आला. श्रेयसने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली.

रोहित ६३ चेंडूत ८६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १३६.५१ होता. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. अय्यरने चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि सामना संपवला. ६२ चेंडूत ५३ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. के.एल. राहुलने २९ चेंडूत १९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आले.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाले.

दरम्यान, अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय गोलदाजांनी पाकिस्तान संघाला २०० रनांच्या आतच रोखण्यात यश मिळविले. तसेच भारतीय संघांला २०० ची धावसंख्या सहजरित्या पार करता येणे शक्य होते. त्यामुळे आजचा भारताचा विजय गोलदाजांच्या खेळामुळे मिळविलेला विजय असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version