Marathi e-Batmya

महायुतीच्या अनेकांना मंत्री पदाची शपथ घेताना मराठीचा स्पष्ट उच्चार करता येईना

राज्याच्या राज्यपाल पदी भाजपाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकालात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेताना महापुरुषांची नावे, किंवा एखाद्या शब्दाचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केला तर त्या मंत्र्यास पुन्हा नव्याने शपथ घ्यायला लावल्याची घटना अद्यापही राज्याच्या इतिहासात ताजीतवानी आहे. मात्र विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मात्र महायुतीच्या अनेक आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेताना काही शब्दांचा नीट्सा शब्दोच्चार करता आली नाही, तर काही जणांनी शब्दच वगळून टाकल्याचे अनेक उदाहरणे आजच्या शपथविधी कार्यक्रमात पाह्यला मिळाली.

नियोजित वेळेप्रमाणे मंत्र्यांच्या शपथविधीला संध्याकाळी ४ वाजता सुरुवात झाली. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक जणांना काही शब्दांचे उच्चार नीट्से करता आले नाही. त्यामुळे मंगलप्रभात लोढा तर नेमके कोणत्या भाषेत शपथ घेत होते आणि कोणत्या शब्दांचा उच्चार करत होते असा प्रश्न शपथ घेताना जाणवत होता.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतही अशीच अवस्था होती. त्यामुळे मराठी मरायभूमीत लहानाचे मोठे झालेले असताना अनेक मंत्र्यांना साधी मराठी भाषेत असलेली मंत्री पदाची शपथ घेता आली नाही. भाजपाच्या आमदारांबरोबरच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक आमदारांचीही हीच अवस्था, आशिष जयसवाल असतील किंवा अन्य अमराठी भाषिक आमदारांची आणि काही मराठी आमदारांची अशीच दमछाक होताना दिसत होती. त्यामुळे ज्या मराठी भाषिक महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटण्याची ग्वाही देणाऱ्या भाजपाच्या आणि महायुतीतील मंत्र्यांना साधी मराठी स्पष्ट शब्दात बोलता येत नाही अशी नव्याने दिसून आली.

त्यातच अनेक मंत्री पदाची शपथ घेतलेल्या आमदारांना शपथ पत्रातील जोड शब्दांचे नीट्से उच्चारण करता आले नसल्याचे दिसून आले. शपथविधीचे थेट प्रक्षेपण होत असताना जोड शब्दांचा मंत्रीपदावर विराजमान होणाऱ्याकडून मराठी भाषेची एकप्रकारे पायमल्ली होताना दिसून येत होती.

वास्तविक पाहता राज्याचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनाही बहुतेक मराठी भाषा येत नाही. त्यामुळे मंत्र्यांनी शपथ घेताना कोणत्या शब्दांचे नीट्से उच्चारण झाले नाही याचे भान त्यांना कदाचित आले नसावे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या शपथविधी सोहळ्यात आणि आज ३९ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वतः एकालाही शपथ दिली नाही. उलट राज्यपालांच्या वतीने राजशिष्टाचार विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आज झालेल्या ३९ मंत्र्यांना शपथ दिली. त्यामुळे मंत्र्यांना दिलेल्या शपथ कितपत वैध आहे याविषयीही काहीजणांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.

शपथविधी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे फुटेजः तुम्हीच पहा आणि ठरवा कोणत्या कोणत्या मंत्र्याने शुद्ध मराठी आणि स्पष्ट शब्दात शपथ घेतली

Exit mobile version