Marathi e-Batmya

मल्लिकार्जून खर्गे माहिती, खासदार निलंबनप्रकरणी २२ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन

संसदेच्या सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज पुन्हा संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा सभागृहात केली. त्यामुळे विरोधी बाकावरील ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. तसेच हे सर्व खासदार इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे खासदार असल्याने या निलंबन आणि भाजपाच्या विरोधात आगामी रणनीती ठरविण्यासाठी इंडिया आघाडीतील २८ पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, आज इंडिया आघाडीतील सहभागी राजकिय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. देशाच्या संसद सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या खासदारांनी याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे अशी मागणी राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांनी केली. परंतु केंद्र सरकारकडून यावर निवेदन करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. आज ४९ खासदारांना प्रश्न विचारला म्हणून निलंबित करण्यात आले आहे.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे विविध ठिकाणी जात संसद सुरक्षेच्या प्रश्नावर सविस्तर बोलत आहेत. परंतु बाहेर बोलताना जी वक्तव्ये करत आहेत तीच वक्तव्ये संसदेत येऊन करा म्हणून संसदेत मागणी केली की अशी मागणी करणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मुळ प्रश्नापासून पळून जाण्याचा हा प्रकार आहे अशी टीकाही केली.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले, या सर्व मुद्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. या निलंबन कारवाईच्या विरोधात २२ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.

या चर्चे दरम्यानच, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी इंडिया आघाडीतील काही पक्षांनी बैठका होत नसल्याचा आरोप केला आहे. याविषय पुढील लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जागा वाटपाबाबत काय ठरले आणि पुढील पंतप्रधान कोण असा सवाल केला.

त्यावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत आगामी काळात ८ ते १० बैठका होणार आहेत. त्या बैठकांमध्ये लोकसभा निवडणूकीत प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील कोणत्या पक्षांनी मागणी केल्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक झाल्यानंतर त्यात निवडूण आलेले खासदार पुढील पंतप्रधान निवडतील असेही स्पष्ट केले.

Exit mobile version