Marathi e-Batmya

संसद सुरक्षा भंग प्रश्नी सत्ताधारी निलंबनाचे सत्र सुरूचः आज २ जणांचे निलंबन

संसद सुरक्षा भंग प्रश्नी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा सभागृहात निवेदन करण्याची मागणी आजही १४१ खासदारांच्या निलंबनानंतर राहिलेल्या विरोधी बाकावरील दोन खासदारांनी संसदेत केली. त्यावरून सीपीआय एम आणि केरळ काँग्रेसच्या दोघांना आज निलंबित केले.

लोकसभेतून काल संध्याकाळपर्यंत इंडिया आघाडीतील १४१ खासदारांना निलंबित केले होते. आज आणखी दोघांना निलंबित केल्याने संसदेतील निलंबित खासदारांची संख्या १४३ वर पोहोचली आहे. यामध्ये निलंबनाच्या कारवाईतून ९७ खासदार लोकसभेतील आहेत तर राज्यसभेतून ४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संसद सुरक्षा प्रश्न लोकसभेत केरळ काँग्रेसचे सी थॉमस आणि सीपीआयएमचे खासदार ए.एम.आरिफ यांनी उपस्थित करताच लोकसभा अध्यक्षांनी हक्कभंग समितीच्या शिफारसीनुसार या दोघांना निलंबित करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

संसदेतील काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून सातत्याने संसद सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकार विरोधकांच्या मागणीनुसार संसदेत कोणतेही भाष्य करण्याऐवजी संसदेतील सुरक्षेप्रश्नी सध्या तपासाचे काम सुरु आहे. हे तपासाचे काम पूर्ण झाल्यानंतर संसदेत निवेदन करण्याचे आश्वासन विरोधकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version