Marathi e-Batmya

इंडियाच्या धास्तीने संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपून साधारणतः २० दिवस पूर्ण होत आले. या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून मणिपूर राज्यातील हिंसाचार, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर चांगलेच मोदी सरकारला घेरले. त्यातच इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. मात्र या आघाडीच्या बैठकांचा फटका भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसण्याची शक्यता निर्माण झाले आहे. त्यामुळे विरोधकांच्या मुद्याच्या अनुषंगाने हवा काढून घेण्याच्या उद्देशाने सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन बोलविण्यात आल्याची माहिती दिली.

संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत ​​काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली ट्विटद्वारे सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली.

९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, अधिवेशनाचा अजेंडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही.
१८ -२२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाविषयी नुकतीच माहिती मिळाली. या अधिवेशात अर्थपूर्ण चर्चा आणि संवाद होईलच. पण महाराष्ट्रात याच काळात गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या तारखेबाबत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री विचार करतील, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली.

दरम्यान, हे विशेष अधिवेशन नेमके कशासाठी आयोजित करण्यात आले आहे. याची कोणतीही माहिती केंद्र सरकारकडून उघड केली नसल्याने या विशेष अधिवेशनात नेमकी कशावर चर्चा करण्यात येणार आहे याकडे राजकिय पक्षांबरोबर जनतेचेही लक्ष लागले आहे.

Exit mobile version