Marathi e-Batmya

रशियाच्या हल्ल्यात कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मागील सहा दिवसापासून रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. मात्र युक्रेनला रस्त्यावरून महत्वाच्या शहरांकडे सरकणाऱ्या रशियन सैन्याला रोखण्यात काही प्रमाणात यश आलेले असले तरी रॉकेट हल्ला, मिसाईल हल्ला किंवा विमानातून बॉम्बहल्ला रोखण्यात युक्रेनला आणखी म्हणावे तसे यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर खारकीव्ह मधील एका इमारतीवर आज रशियाने रॉकेट हल्ला केला. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या हल्ल्यात कर्नाटकच्या २१ वर्षिय नविन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानेही दुजोरा दिला.

रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खारकीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील पहिली चर्चेची फेरी बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी लवकरच चर्चेची दुसरी फेरी ‘त्वरित युद्धविराम या मुख्य मागणीवरून होणार आहे. युक्रेनमधून रशियन सैन्याची माघार हा युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांतता चर्चेचा मुख्य उद्देश असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.

रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात अडचणी येत असून भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनहून बेलारूस, रूमानिया, पोलंड आदी देशांच्या सीमेपर्यंत पोहचण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागत आहेत. आतापर्यंत ८ ते ९ हून अधिक विमानातून जवळपास १५ विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात भारत सरकारला यश आले आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना आवाहन केले असून या आवाहनाद्वारे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेन सोडावे असे आवाहन केले.

Exit mobile version