मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजाविता यावे यासाठी मतदार नोंदणीची २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहीमे दरम्यान २ लाख ५३ हजार मतदारांनी आपले नावे नोंदविण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाचे दिलीप शिंदे यांनी दिली.
२३ फेब्रुवारी रोजी १ लाख २ हजार ६२ जणांनी तर २४ फेब्रुवारी रोजी १ लाख ५० हजार मतदारांनी आपली नावे नोंदवली. तरीही राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात अद्यापही अनेकांनी नावे नोंदविली नसल्याने त्यासाठी पुन्हा एकदा नाव नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम २ व ३ मार्च २०१९ रोजी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील तालुका, गांव पातळीवर मतदार यादीचे चावडी वाचन करण्यात येणार आहे. जेणेकरून निरक्षर मतदारांना आपले नाव यादीत आहे किंवा नाही हे समजू शकणार आहे. त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलविण्यासही ग्राम पंचायतींना सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत लोकसंख्येच्या प्रमाणात जवळपास ३३ टक्के नवमतदारांनी अद्याप आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसात २ लाख ५३ हजार मतदारांनी केली नाव नोंदणी
