Marathi e-Batmya

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांचा आरोप, चाचण्याचे रिपोर्ट्स देत नाहीत

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून संफरदरजंग रूग्णालयात हलवित त्यांचे उपोषणाचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयात पोलिसांनी हलविल्यानंतर त्यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंग्मो यांनी सरकारी सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या पतीवर केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासण्यांबाबत शंका उपस्थित केली. तसेच सोनम वांगचुक यांच्यावर ज्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्याचे रिपोर्टस रुग्णालयाकडे मागितले. मात्र गीताजंली आंग्मो यांना अद्याप तपासणीचा कोणताही अहवाल मिळालेला नसल्याचे सांगितले.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो पुढे म्हणाल्या की, केवळ निरीक्षण आणि चाचण्या केल्या जात आहेत आणि आम्ही प्रत्यक्षात एखाद्या बाह्य प्रयोगशाळेत (external lab) या चाचण्या करून घेणार आहोत. ते आम्ही मागितलेले अहवाल देत नाहीत; तसेच ते पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत खाली पोहोचल्याचे जे आकडे सांगत आहेत, त्याबद्दलही शंका आहे. काल ती पातळी ४.३ होती, त्यामुळे आज ती इतकी बदलू शकत नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतरवरून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. वांगचूक २८ जूनपासून तिथे उपोषणाला बसले होते.

पोलिसांनी त्यांना तिथून हलवण्याची कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली होती, या दाव्यालाही गीतांजली जे. आंग्मो यांनी आव्हान देत म्हणाल्या की, “न्यायालयाने केवळ एवढेच म्हटले होते की, व्यक्तीचे आरोग्य सर्वोपरि आहे आणि त्यावर नियमित अंतराने देखरेख ठेवली जावी; रुग्णालयात दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला नव्हता,” असेही स्पष्ट केले.

गीतांजली जे. आंग्मो पुढे बोलताना म्हणाल्या की, त्यामुळे, ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सध्या त्यांच्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार सुरू नाहीत, असेही सांगितले.

सोनम वांगचूक यांचे उपोषण अजूनही सुरू असल्याचा दावाही केला. “ते अजूनही उपोषणावर आहेत; उपोषण सुरूच आहे कारण ते कोणतीही साखर घेत नाहीत. ते केवळ मीठ-पाणी घेत आहेत, जे ते आधीपासून घेत होते,” असे आंग्मो यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने यात आणखी हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. “त्यांना इथे आणण्याची काळजी सरकारने घेतली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, पण पुढील पावले आम्ही स्वतःच उचलणार आहोत; या प्रकरणात सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नाही. ते नक्कीच अशक्त झाले आहेत आणि त्यांचे स्नायूंचे प्रमाण कमी होत आहे—जे कोणत्याही उपोषणादरम्यान घडतेच—पण ते पूर्णपणे जागरूक आणि मानसिकदृष्ट्या खूप खंबीर आहेत,” असे त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी, गीतांजली जे. आंग्मो यांनी सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांना स्पष्टपणे बजावले होते की, त्यांच्या आणि सोनम वांगचूक यांच्या दीर्घ उपोषणादरम्यान त्यांच्या आरोग्यावर देखरेख करणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय सोनम वांगचूक यांना तोंडावाटे किंवा शिरेवाटे (intravenously) काहीही दिले जाऊ नये. “मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे [सोनम वांगचुक] यांना दाखल करण्यात आले आहे. माझी, त्यांच्या कुटुंबीयांची आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा शिरेवाटे (intravenous) कोणतेही औषध किंवा उपचार दिले जाऊ नयेत,” असे अँगमो यांनी ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये लिहिले.

५९ वर्षीय वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शुक्रवारी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.

“काल त्यांची प्रकृती ठीक होती. त्यांना रुग्णालयात आणण्याची गरज नव्हती. कलम ३२ अन्वये हा माझा अधिकार आहे. माझ्या आणि माझ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय त्यांना काहीही दिले जाऊ शकत नाही,” असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून “आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी” सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला; तरीही पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून ही प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली. आम्ही जंतरमंतर येथील आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने ती जागा रिकामी करावी, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.

शुक्रवारी रात्री सोनम वांगचुक यांनी सांगितले होते की, प्रकृती खालावत असूनही उपोषण सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार पक्का आहे; तसेच तोपर्यंत त्यांचे २० टक्के शारीरिक वजन (body mass) कमी झाले असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

केंद्र सरकारने उच्च न्यायालयात असे सांगितल्यानंतर दोन दिवसांनी वांगचुक यांना जंतरमंतरवरून हलवण्यात आले; सरकारने सांगितले होते की, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार पुरवले जातील. सोनम वांगचुक यांच्या खालावणाऱ्या आरोग्याबाबत वाढती चिंता पाहता, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरकारने ही माहिती दिली होती.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने सरकारला निर्देश दिले होते की, सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज वैद्यकीय तपासणी केली जावी आणि गरज भासल्यास आवश्यक पावले उचलली जावीत; तसेच “कोणत्याही नागरिकाचा जीव मौल्यवान असतो,” असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

शनिवार हा वांगचुक यांच्या उपोषणाचा २१ वा दिवस होता; ‘नीट’ (NEET) परीक्षेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते.

हे उपोषण म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) जंतर-मंतर येथे पुकारलेल्या व्यापक आंदोलनाचाच एक भाग होते. या आंदोलनाद्वारे कथित परीक्षा घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी व त्यास जबाबदारी निश्चित करण्याची मागणी, तसेच परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली जात होती.

‘कॉकरोच जनता पार्टी’ने संसदेवर काढण्याचे नियोजित केलेले मोर्चा निघण्यापूर्वी दोन दिवस आधीच पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवले. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते.

Exit mobile version