मुंबईः विशेष प्रतिनिधी
मागील तीन महिन्यापासून एमईआरसी अर्थात वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी सनदी अधिकाऱ्यांकडून लॉबींग सुरु असतानाचच आता या निवड समितीचे अध्यक्ष पदी असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव संजयकुमार यांनी आयोगाच्या अध्यक्ष पदी आपला अर्ज भरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सध्या राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी हे कार्यरत आहेत. मात्र त्यांचा कालवधी संपत आला असल्याने त्यांच्या जागी राज्याचे माजी मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु होती. नेमके याच कालावधीत मुख्य सचिव संजयकुमार यांच्या मुख्य सचिव पदाचा कार्यकाल संपत आला आहे. त्यामुळे या पदावरून निवृत्त झाल्यानंतर राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे नियामक आयोगावरील अध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव हे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यामुळे आता मुख्य सचिवांनीच अध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्याने या समितीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच निवड समितीवर असलेल्या अध्यक्षानेच एमईआरसीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार असलेल्या अजोय मेहता यांची वर्णी लागणार की राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या संजीव कुमार यांची वर्णी लागणार याबाबत मंत्रालयीन प्रशासनात उस्तुकता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांची वर्णी कि राज्याच्या मुख्य सचिवांची ?
