मुंबई : प्रतिनिधी
त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचे काम जोमाने सुरु असून आतापर्यंत चार वर्षात ३५८.१४९ हेक्टर वन जमीनीवर या पद्धतीने ५ लाख १७ हजार ०९६ वृक्षलागवड झाली आहे, अशा पद्धतीने राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करणारे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अवनत क्षेत्रावर वनीकरण करण्याबाबत वन विभाग औद्योगिक संस्था, अशासकीय संस्था यांच्यात काल त्रिपक्षीय करार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, या औद्योगिक संस्थांकडे, कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता असते. ज्या कंपन्या त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्ष लागवडीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जावे तसेच ज्या कंपन्या केवळ आपला सामाजिक दायित्व निधी देऊ इच्छितात त्यांना विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्ष लागवडीची माहिती देऊन त्यासाठी त्यांचे वित्तीय सहाय्य घेतले जावे. यासाठी वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागा व इतर संबंधित माहिती (ट्रीगार्ड, पाण्याची व्यवस्था, वृक्षांचे जतन आणि संवर्धन) ज्यात ते निधीच्या माध्यमातून योगदान देऊ शकतात त्यांची यादी केली जावी व ती त्यांना पाठवली जावी.
यंदा हरित दिवाळी साजरी केली जावी असे आवाहन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, विदर्भात ९२ हजार हेक्टर झुडपी जंगल आहे तिथे तसेच मराठवाड्यात वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जावे, मराठवाड्यातील इको बटालियनला सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून सहकार्य केले जावे, सामाजिक दायित्व निधीतून मराठवाड्यात शेतात, शेतजमिनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जावा.
काल ५५.७० हेक्टर वनक्षेत्रावर जवळपास ५० हजार रोपे लावण्यासाठी चार औद्योगिक तसेच अशासकीय संस्थांना मान्यता देण्यात आली. यामध्ये मे. जिंदाल स्टील लि. डोलवी, टेरे पॉलिसी सेंटर, पुणे, आणि वन विभाग यांच्यात करार करण्यात आला. ही संस्था मौजे डोलवी, ता. पेण, जि. रायगड येथे २५ हेक्टरवर जवळपास २८ हजार वृक्ष लावणार आहे.
स्पॅन फुडस्, पुणे आणि रोटरी क्लब, पुणे या संस्था मौजे महम्मदवाडी ता. हवेली, जि. पुणे येथे १८ हेक्टरवर ७२०० रोपे लावणार आहे. लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि आणि ग्रामीण लोकसेवा संस्था, गुमलकोंडा ही संस्था मौजे बोदली, ता. गडचिरोली जि.गडचिरोली येथे १० हेक्टरवर ११ हजार रोपे लावणार आहे. श्री. गजानन महाराज संस्थान, शेगाव, श्री. गजानन शिक्षण संस्था- शेगाव ही संस्था मौजे गिरडा, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा येथे २.७० हेक्टरवर १६८७ वृक्ष लावणार आहे. या चार ही औद्योगिक आणि अशासकीय संस्थांकडून होणाऱ्या अंदाजे ५० हजार वृक्ष लागवडीसाठी ते २ कोटी ३० लाख रुपयांच्या आसपास खर्च करणार आहेत. वन विभागाच्या जमिनीवर सात वर्षांचा करार करून या संस्था वृक्ष लागवड, जतन आणि संवर्धन करतात. त्यानंतर हिरवाई फुललेलं हे वन, वन विभागाच्या ताब्यात दिले जाते. राज्यातील हरित क्षेत्र वाढण्यासाठी हे त्रिपक्षीय करार उपयुक्त सिद्ध होत आहेत.