Marathi e-Batmya

हवामान खात्याची गुडन्युजः यंदाचा मान्सून नियोजित वेळेत आणि सरासरी पेक्षा जास्त

एप्रिल महिन्याच्या मध्यालाच उन्हाचा पारा ४० वर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या काहीलीने आणि घामाच्या धारांमुळे चांगलाच हैराण झाला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रात कमी प्रमाणात हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील जनतेला आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा जून ते सप्टेंबर महिन्यात येणारा मान्सून हा नियोजित वेळेत आणि सरासरीपेक्षा जास्त दिर्घकालीन राहणार असल्याचे अंदाज भारतीय हवामान खात्याने आज जारी केला.

२०२३-२४ रोजी राज्यात मान्सूनने नियोजित वेळेत हजेरी लावली. मात्र महाराष्ट्राच्या सर्वदूर भागात सरासरी इतकाही पडला नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाण्याचा टँकर राज्यात सुरु करण्याची पाळी राज्य सरकारवर आली. तर आजस्थितीला महाराष्ट्रात १५०० हून अधिक टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरविण्यास सुरुवात केली आहे.

याच वर्षात मान्सूनने जवळपास ९० टक्क्याहूनही कमी हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा कमी निर्माण झाला. तर अनेक भागात पाणी कपातीचे धोरण स्विकारण्यात आले. जानेवारी महिना अखेर अनेक धरणात तर ५० टक्के इतकाही पाणी साठा शिल्लक राहिला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एप्रिल महिन्यात पाणी साठा हा ४० टक्क्याच्या खाली पाणीसाठा उतरण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय हवामान खात्याने जाहिर केलेल्या अंदाजानुसार संपूर्ण देशभरात मान्सूनचा पाऊस सक्रिय होणार आहे. तर ५ टक्क्याच्या त्रुटीसह १०६ टक्के दिर्घकालीक पाऊस देशभरात पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात अल् नीनो या वादळाचा प्रभाव मान्सूनचा ऋतु सुरु होण्यापूर्वी कमी झालेला असणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अल् नीनो वादळ चांगल्यापैकी विकसित झालेले असणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मान्सूनच्या विकासाच्या परिस्थिती असून त्या अनुषंगाने समुद्री वारे वहात असल्याचा अंदाजही यावेळी व्यक्त केला.

 

Exit mobile version