Marathi e-Batmya

मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी, पुढील ४८ तास रेड अलर्ट

मागील तीन दिवसापासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली कायम आहे. मात्र काल रात्रीपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावत आपले अस्तित्व दाखवून दिले.त्यामुळे आज मुंबईसह राज्यातील सर्वच भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यातच उद्या आणि परवा मुंबईत मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, चेंबूर मध्ये संरक्षक भित कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिला जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर इतर व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे.

मुंबईत दादर- मांटुगा रोड, घाटकोपर, अंधेरी आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचले. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात अडकून पडल्याचे चित्र या परिसरात पाह्यला मिळाले. तसेच या मार्गावरील वाहतूक धीमी असल्याचे दिसून येत होते.

तर राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत होते. त्यातच नांदेडमधील नदीला पूर आल्याने नदीच्या आसपासचा परिसरात पाणी शिरले. तसेच शेतात पाणी शिरल्याने पिक नुकसानी संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने गरज असेल तर बाहेर पडा असा सतर्कतेचा इशारा भारतीय हवामान खाते आणि राज्य सरकारच्या आपतकालीन कार्य केंद्राने जनतेला दिला आहे.

Exit mobile version