Marathi e-Batmya

हवामान खात्याने पुढील २४ तासासाठी मुंबईसह या जिल्ह्यांना दिला पावसाचा रेड अलर्ट

राज्यातील बहुतांष जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. त्यातच मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. तर पुणे शहरात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे पुण्याच्या अनेक भागात घरांनी पाणी शिरल्याचे पहायला मिळाले. तर सिंहगड रोडवरील एकता नगर येथील सोसायटीत छातीपर्यंत पाणी साचले होते. त्यातच आता हवामान खात्याने पुढील २४ तासासाठी आणखी एकदा रेड अलर्ट जारी केला. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूर आदी भागातील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुणे शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच या भागातील अनेक नद्या नाले हे आधीच आज दिवसभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी गावांना जोडणाऱ्या पुलांवर पाणी आल्याने पाणी आलेल्या पूलावरील वाहतूक बंद कऱण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून डोंगर-दऱ्या आणि पाणी असलेल्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये असे आवाहन करत गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Exit mobile version