Marathi e-Batmya

पुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

काल रात्रीपासून मान्सूनच्या पावसाने मुंबईसह उपमगरात जोरदार बॅटिंग केल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळणे, संरक्षक भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. त्यातच प्रामुख्यानं कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अ‌ॅलर्ट आणि ऑरेंज अ‌ॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याचेवळी राज्याच्या इतर भागात तुरळक पावासाचा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान विभागानं १८ जुलै साठी कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, १९ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

१८ जुलैला पालघऱ, ठाणे, पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला गेला आहे. तर, १९ जुलै रोजी पुणे, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला गेला आहे. २० जुलै ,२१ जुलै आणि २२ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लाऊ शकतो.

१८ जुलैरोजी नंदूरबार, अमरावती,नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलाडाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर १९ जुलै रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. २० जुलै रोजी अमरावती आणि नागपूर तर २१ जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली आणि २२ जुलै रोजी भंडारा आणि गोंदियाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. यलो अ‌ॅलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पाऊसाचे आगमन झालं आहे. शहरासह धरण क्षेत्रातही पाऊस सुरु झाल्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. यवतमाळ मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर, यवतमाळ सह जिल्हाभरात सर्वदूर पाऊसाचे आगमन झालं आहे. हिंगोलीमध्येही दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांती नंतर दमदार पावसाला सुरुवात झाल्यानं निदंणी खुरपणी, कोळपणीच्या कामांमध्ये खंड आला आहे.

Exit mobile version