Marathi e-Batmya

पुढील पाच दिवस पाऊसः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बरसणार

भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोकणसह, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर चार दिवस पाऊस कोसळणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविला आहे.

राज्यातील कोकणात एकाबाजूला पावसाने चांगलीच हजेरी लावलेली असली तर दुसऱ्याबाजूला राज्यातील अनेक भागात मात्र पावसाने म्हणावा इतका अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनचे आगमन झालेले असले तरी पाऊसाची हजेरी म्हणाव्या त्या प्रमाणात लागलेली नसल्याने पिण्याचा प्रश्न अनेक भागात भेडसावत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने घाट माथ्यावर पुढील चार दिवस वीजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनची हजेरी कमी जास्त प्रमाणात राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. वास्तविक पाहता राज्यातील धरणक्षेत्रात अद्याप म्हणाव्या इतक्या पावसाची नोंद झालेली नसल्याने पाण्याचा प्रश्न आणखी पुढील काही काळ असा आ वासून राहणार असल्याचे बोलले जात आहे.

तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा अद्यापही कायम राहिला असल्याने महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाची चांगली हजेरी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version