Marathi e-Batmya

दुष्काळामुळे साखरेच्या उत्पादनात घट होणार

मुंबईः प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असला तरी राज्यातल्या जनतेला कमतरता भासणार नसल्याचा दिलासा सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. त्याचबरोबर जे कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिला नाही अशा ११ कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणीही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना करणार त्यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री खोत बोलत होते.
गेल्यावर्षी राज्यात १०७ लाख मेट्रीक टन तर देशात ३२० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता राज्यात १ लाख ११० मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. देशात या वर्षी ३५५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज होते. यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रात खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्याकडून ९९ टक्के एफआरपी दिली आहे. देशात सर्वाधिक एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाली आहे. मात्र अजूनही ११ साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरफी दिली नसल्याचे सांगत अशा कारखानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
२० लाख मेट्रीक टन साखर चीनला निर्यात करणार असून या निर्यातीमुळे साखरेचे दर कमी होवून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version