Marathi e-Batmya

रेल्वे तिकीट दर ३० टक्क्यांनी स्वस्त होणार

मुंबईः प्रतिनिधी
रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) अपग्रेड करत आहे. हे अपग्रेडेशन १४ नोव्हेंबरच्या रात्री ते २१ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत होईल. या दरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.३० या वेळेत रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. यामध्ये नवीन ट्रेनची संख्या आणि इतर डेटा अपग्रेड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार होणार आहे. तिकीट दरही पूर्ववत करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवास ३० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे.
रेल्वेने सांगितले की, सर्व गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने ट्रेन नंबर आणि सध्याचे प्रवासी बुकिंग डेटा अपडेट केला जाणार असल्याने टप्प्याटप्प्याने हे करण्याची योजना आहे. यामुळे तिकीट सेवेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी हे काम रात्री करण्यात येणार आहे.
PRS रात्री ६ तास बंद राहील
अपग्रेडेशन १४ आणि १५ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरू होईल आणि २० आणि २१ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत चालेल. यामुळे रात्री ११.३० ते पहाटे ५.३० पर्यंत पीआरएस काम करणार नाही. यामुळे या ६ तासांमध्ये तिकिट आरक्षण, चालू बुकिंग, रद्द करणे आणि चौकशी सेवा यासारख्या कोणत्याही PRS सेवा उपलब्ध होणार नाहीत. पीआरएस सेवा वगळता डायल १३९ सेवांसह इतर सर्व चौकशी सेवा उपलब्ध राहतील.
विशेष गाड्या नेहमीच्या गाड्यांप्रमाणे
कोरोनाच्या काळात स्पेशल म्हणून आणि वाढलेल्या भाड्याने धावणाऱ्या सर्व गाड्या आता जुन्या नावाने आणि क्रमांकाने धावतील. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा जाहीर केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात विशेष गाड्यांमध्ये रूपांतरित झालेल्या सर्व गाड्या आता पूर्वीप्रमाणेच चालवल्या जातील. यामुळे या गाड्यांमध्ये आकारले जाणारे विशेष शुल्क कमी होईल. परिणाम भाडे सुमारे 30 टक्क्यांनी कमी होईल.
कोरोनामुळे देशभरातील रेल्वे मार्च २०२० पासून बंद होत्या. नंतर हळूहळू बहुतांश रेल्वे गाड्या कोरोना काळात सुरू करण्यात आल्या. मात्र, नियमित गाड्याऐवजी मेल-एक्स्प्रेसच्या नंबरमध्ये बदल करून विशेष तिकीट दराने या गाड्या धावत आहेत. सामान्य नागरिकांना परवडणारे रेल्वेचे तिकीटही विशेष गाड्यांच्या नावावर वाढविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र आता कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासावरील निर्बंध उठवले आहेत. रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या निर्णयानुसार १ हजार ७०० पेक्षा अधिक मेल-एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. रेल्वे प्रवास करताना कोरोनाचे सर्व नियम लागू असतील.

Exit mobile version