Marathi e-Batmya

परदेशी प्रवास आणि लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी होणार

पुणेः प्रतिनिधी
कोरोना व्हायरसची अनुषंगाने समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे एखादा परदेशी प्रवास करून आला असेल आणि एखाद्यामध्ये तशी लक्षणे दिसत असतील तरच त्या व्यक्तीची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
एनआयव्ही फाऊंडेशन संस्थेला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त दिपक म्हैसकर आदी उपस्थित होते.
सर्दीमुळे नाक सतत वाहतेय, ताप आलाय किंवा स्वतःला कोरोना विषाणूची लागण झालीय म्हणून अनेक जण कोरोनाची चाचणी करण्यासाठी येत आहेत. मात्र अशा रूग्णांची चाचणी केली जाणार नाही. जर तुम्ही परदेशी प्रवास केला असेल आणि अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्याने तुमच्यामध्ये तशी लक्षणे दिसत असतील तर चाचणी करणे शक्य होणार आहे. या आजाराची चाचणी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्याने नागरीकांनी पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून चाचणीसाठी केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सध्या समाजात वाइन पिल्याने, अंगाला दारू लावल्याने कोरोना व्हायरस होत नसल्याचा गैरसमज पसरला आहे. तसेच चिकन खाल्याने किंवा एखाद्याने खोकला म्हणून त्याला कोरोनाची लागण झाली असे समजणे चुकीचे असल्याचे सांगत थुंकीमुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील केईएम रूग्णालय, कस्तुरबा रूग्णालय येथे उद्या सकाळपर्यंत तर हाफकिन संशोधन केंद्रात कोरोना व्हायरसची चाचणी करणारी तीनन केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जे.जे. हॉस्पीटल, सांगली-मिरज, औरंगाबाद यासह अन्य मेडिकल कॉलेज असलेल्या भागात याची चाचणी केंद्रे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात चाचणी केंद्र सुरु करण्याबाबत आणि खाजगी लॅबला कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही यास होकार कळविला आहे. मात्र सुरुवातीला शासकिय रूग्णालयातच या लॅब सुरू करण्याबाबतचे त्यांनी सांगितले आहे. तसेच केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून १० लाख किटची ऑर्डर नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे
पिंपरी चिंचवड मनपा- १०
पुणे मनपा- ८
मुंबई- ७
नागपूर- ४
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी- ३
रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी- १
एकूण: ४२

Exit mobile version