मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना हा आजार बरा होत आहे. सध्या १० लाख लोकांमागे ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे सांगत मृत्यूदारमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. हि वाढही कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील रेमडेसिवीर, फ्लीकवीर यासह उपलब्ध असलेली पाच औषधे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ही सर्व औषधे सर्वसामान्य नागरिक असलेल्या सर्व कोरोनाग्रस्त रूग्णांना माफक दरात देण्यात येणार आहे. सध्या या औषधांची निर्मिती सिप्ला आणि हॅक्टर या कंपन्यांकडून सुरु असून ही औषधे पुढच्या महिन्यापर्यत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील काही दिवस राज्यात अॅब्युलन्सबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, आरटीओकडून त्या त्या भागातील चांगल्या अॅब्युलन्स ताब्यात घेवून त्याचे दर निश्चित करून त्याचे भाडे राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. मात्र कोरोनाग्रस्त रूग्णांना अॅब्युलन्सची सेवा मोफत मिळणार आहे. तसेच खाजगी ज्या अॅम्युलन्स ताब्यात घेतलेली नाहीत अशांसाठी दर आकारणी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय कोरोना चाचणीसाठी अॅन्टीजेंट टेस्टींग सुविधा सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. या टेस्टींगचा वापर प्रामुख्याने कोरोनाविरोधी लढ्यातील फ्रंट लाईन वाल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणार असला तरी ही चाचणी इतरांनाही करता येणार आहे. या चाचणीचा अहवाल अर्धा ते एक तासात उपलब्ध होणार असून या साठी अवघे ४५० रूपयांमध्ये ही चाचणी करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही चाचणी कंटामेंन्ट भागातील नागरिकांच्या चाचणीकरीताही वापरता येणार आहे. तसेच सीव्हेरा चाचणीची अर्थात अॅण्टीबॉडी चाचणीची सुविधाही उललब्ध करून देण्यात आल्याचे सांगत या चाचण्या केल्याने रूग्णांचा अहवाल लगेच मिळून उपचार करायला सोपे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खुशखबर: कोरोनावरील औषधांचा मुबलक साठा लवकरच प्रत्येक जिल्ह्यात
