मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ‘टेलीआयसीयु’ सुविधेचा वापर केला जणार असून मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या ७ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. १० ते १५ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र सुमारे तीन टक्के रुग्ण जे गंभीर आहेत, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार आवश्यक आहेत. अशा रुग्णांवर उपचार करताना आयसीयुमधील जे विशेषज्ञ आहेत त्यांची संख्या वाढविली जात आहे. मात्र मेडीस्केप या डॉक्टरांच्या फौंडेशनमार्फत नविन तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘टेली आयसीयु’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव फौंडेशनने दिला आहे.या फौंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही आयसीयुंचे व्यवस्थापन केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यासाठी आयसीयुमधील प्रत्येक बेडला लावलेल्या मॉनीटरवरील रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचे नियंत्रण ‘टेली आयसीयु’मार्फत केले जाईल. या सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून उपचाराचा सल्ला देखील देणार असून सध्या सात जिल्ह्यांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध केली जाणार आहे. तीची यशस्विता पाहून राज्यातील अन्य जिल्ह्यातही सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आता ‘टेलीआयसीयु’ तंत्रज्ञान
