Marathi e-Batmya

गरज प्रत्येक कुटुंबासाठी मानसतज्ञाची

जगभरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेतली असता, मानवाची अवस्था अतिशय केविलवाणी दयनीय झालेली दिसून येते. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती राग चिडचिड निराशा यासारख्या भावनांची रेलचेल चालू आहे. ही अवस्था सर्व स्तरातील, वयोगटातील, भागातील लोकांमध्ये पाहायला मिळते. अशा बिकट परिस्थितीत धैर्य खचून जाताना दिसून येते. विशेषतः मानसिक, भावनिक दृष्ट्या अस्थिर लोकांमध्ये या भावना प्रकर्षाने जाणवतात. मानसिक समतोल खालावलेला दिसून येतो. याचा परिणाम लोक आत्महत्येस प्रवृत्त होतात. सेलिब्रिटी पासून शेतकरी, कामगार देखील या मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत.

लहान मुलं, किशोरवयीन मुलांची मनावर नकळतपणे या सर्व गोष्टींचा नकारात्मक प्रभाव झालेला दिसून येतो. पुढच्या पिढीला देखील आपण अजाणतेपणी मानसिक दृष्ट्या आजारी करत आहोत आणि हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. येणाऱ्या छोट्या-मोठ्या संकटांना आपण टाळू शकत नाही. मात्र त्यातून यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. यासाठी आपण आपले पालक, मित्र, शिक्षक, नातेवाईक यांची मदत घेऊ शकतो.  पण तरी देखील ही भावनिक मानसिक कोंडी वाढतच गेली तर, आपल्या आत्म जणांच्या एवढेच भावनिक जिव्हाळ्याने तुम्हाला समजून घेणारे तज्ञ हे समुपदेशक व मनोसोचार तज्ञ असतात. त्यांच्याकडे जाणे म्हणजे आपण वेडी किंवा मनोरुग्ण आहोत असे न समजता, आपणाला होणारा भावनिक मानसिक परिणामी शारीरिक त्रास यातून बाहेर पडण्यासाठी करून दिलेली एक वाट आहे. खूप वर्षापासून आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रुजू आहे. त्यांना आपण आपल्या घरातील प्रत्येकाची छोटी-मोठी शारीरिक दुखणे सांगत असतो व आपल्या गरजेनुसार त्यांच्याकडून आपल्याला ट्रीटमेंट मिळत असते. कोणतेही दुखणे आपण पण सहजगत्या सांगतो. तर मग शरीर सुदृढ राहण्यासाठी एका तज्ञाची मदत घेणे योग्य आहे असे असताना आपले मन जोपासणे, भावनांचा चढ-उतार, कामाचा होणारा ताण, मग तो गृहिणीचा असो अथवा वर्किंग वुमन्सचा असो, अभ्यासाचा ताण मित्रांशी होणारे वारंवार वाद हट्टीपणा करणाऱ्या मुलांमधील वाढत चाललेली चंचलता, पालकांमधील मतभेद, झोप न लागणे, भूक न लागणे. ह्या सगळ्या समस्या भावनिक व मानसिक असंतुलन याच्यामुळे होतात. त्यावर आपल्या आप्त जणांकडे चर्चा केल्याने मार्ग निघतो. परंतु चर्चेतून समजावून सांगून भावनिकता मानसिकता पूर्ववत होत नसेल, तर मात्र यावेळी तज्ञांची मदत घेणे योग्य आहे.

हे पालकांनी घरातील मोठ्या व्यक्तींनी परस्पर बोलले पाहिजे. आपल्या मुलांसमोर त्यांच्या वयाला अनुसरून काही समस्या व व त्यातून बाहेर कसे पडता येईल हे बोलले पाहिजे. त्यामुळे मुलांच्याही लक्षात येईल की अभ्यास, शाळा करिअरची निवड, चांगला जॉब, नवीन शहरातील ॲडजस्टमेंट या अडचणी नसून ते आयुष्याचे एक वळण आहे.  ते आपल्या सकारात्मक मानसिकतेतून आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. यामध्ये आपण एकटे नाही तर पालक मित्र तसेच आपले मानसशास्त्रज्ञ आपल्याबरोबर आहेत. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते त्याप्रमाणे त्याच्या क्षमता व गुणवैशिष्ट्ये वेगवेगळे असतात. हे व्यक्तिमत्व, क्षमता, गुणवैशिष्ट्ये याला अनुसरून आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर येणाऱ्या संभाव्य अडचणी आपले फॅमिली सायकॉलॉजिस्ट आपल्याला सांगू शकतात. याचा परिणाम म्हणून आपल्या मधील निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना मानसिक अवस्था वेळीच समजून घेऊन पुढे भविष्यात निर्माण होणाऱ्या मानसिक त्रासावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनावर लक्ष ठेवून त्यामागची बाजू समजून घेणे महत्त्वाचं ठरेल. आपला स्वभाव-वागणं यामध्ये नकारात्मक रीत्या बदल होत चालला आहे. हे समजून घेतले पाहिजे जसे शारीरिक व्याधींसाठी फॅमिली डॉक्टर आहेत तसेच मानसिक भावनिक चढ-उतार च्या न दिसणाऱ्या भावनांसाठी व्याधींसाठी मानसशास्त्रज्ञ आहेत ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे.

Exit mobile version