Marathi e-Batmya

राज्यात काल दिवसभरात विक्रमी संख्येत लसीकरण

मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्यविभागातील कर्मचारी आणि पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील दोन महिन्यात राज्यात दररोज २५ हजार ते ३५ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात येत होती. मात्र काल सोमवारी १५ मार्च रोजी २ लाख ६४ हजार ८९७ जणांना लस देण्यात आली असून ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
देशात आणि राज्यात लसीकरण अभियानाला १६ जानेवारी २०२१ रोजीपासून सुरु करण्यात आली. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तर राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरण अभियानास प्रारंभ करण्यात आला. राज्यात आतापर्यंत ३१ लाख ३३ हजार ६१२ जणांना लस देण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील ८ लाख ४६ हजार ७३३ कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला. तर ३ लाख ६१ हजार २२२ जणांना दुसरा डोस देण्य़ात आला. तर ५ लाख २७ हजार ३४० फ्रंटलाईन वर्कर पहिला तर ७२ हजार ७७७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. याशिवाय ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आल्यानंतर २ लाख १० हजार ४८७ जणांना पहिला डोस तर ६० वर्षावरील ११ लाख १५ हजार ५३ जणांना पहिला डोस देण्यात आला असून एकूण ३१ लाख ३३ हजार ६१२ जणांनी लस घेतल्याचे आरोग्य विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
१५ मार्च २०२१ रोजी २७१८ लसी करणाच्या केंद्रातून लस घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ६० वर्षावरील आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर संख्या होती.

Exit mobile version