Marathi e-Batmya

‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे एसटी बसेसच्या १३९ फेऱ्या रद्द

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने कळविले आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२ , ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.

दरम्यान, मागील २४ तासाहून अधिक काळ पुणे-मुंबई महामार्गावर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली. सुरुवातीला अनेकांना ही ट्रॅफिक जॅमची समस्या कशामुळे झाली याचा अंदाज आला नाही. अखेर एका टँकरचा अपघात झाल्याने ही वाहतूक कोंडी वाढली असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाने जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकान्वये देण्यात आली.

Exit mobile version