Marathi e-Batmya

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दाखविली “ही” तयारी

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईसह राज्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षेऐवजी ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनास सुरुवात केली. तसेच धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चेची तयारी दाखवित परिक्षेचा वेळ वाढवून दाखविण्याची तयारी दाखविली आहे.

काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असे दुहेरी टेन्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत असल्याचे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावं लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सूरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विचार करतोय, तज्ज्ञांशी चर्चा करत असल्याचे सांगत आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version